मी पणा का असतो - बोधकथा

कर्तृत्वाची शिखरे गाठल्यानंतर असे अलगद ‘मी’पण गळून पडण्यात एक वेगळा अर्थ आहे. तो समजावून घेता आला, तर अहंकार दागिना म्हणून मिरवण्यात कोणालाही धन्यताच वाटेल. 

एका राजाची ही गोष्ट. त्याला काही अधिकारी नेमायचे होते, म्हणून त्याने गावात दवंडी दिली. गावातून शंभरेक तरुण मुलाखतीसाठी आले. त्यांची प्रथम त्याने शारीरिक चाचणी घेतली. नंतर मुलाखती घेतल्या आणि त्यातून त्याने चार तरुण निवडले. प्रधानजींना वाटत होते, या मंडळींना राजाने लगेच नोकरीवर घ्यावे; पण राजा मात्र तयार नव्हता. त्याला या तरुणांची परीक्षा घ्यायची होती. राजाने आदेश दिला, ‘या चारही तरुणांना चार स्वतंत्र कोठड्यांत बंदिस्त करून टाका. त्यांना चार दिवस उपाशी ठेवा.’ राजाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. 

पाचव्या दिवशी राजाने पुन्हा आदेश दिला, ‘आत चारही कोठडीत जेवणाची ताटे पाठवा आणि पाठोपाठ भीती वाटेल, असे एक कुत्रे प्रत्येक कोठडीत पाठवा.’ राजाची आज्ञा सर्वांनी पाळली आणि सर्वजण त्या तरुणांचे निरीक्षण करू लागले. पहिल्या खोलीत ते जेवणाचे ताट आणि कुत्रे जाताच तो तरुण घाबरला. त्याने जेवणाचे ताट कुत्र्यासमोर ठेवले आणि तो देवाची भक्ती करू लागला. राजा म्हणाला, ‘याला आपल्या अध्यात्म विभागात कामाला घ्या. हा तेथील कामासाठी योग्य आहे.’ 

दुसऱ्या खोलीतील दृश्य मजेशीर होते. तो तरुण स्वतःही ताटातले अन्न खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला, ‘याला आपल्या अर्थव्यवहार खात्यात घ्या. हा स्वतःही पैसे खाणार नाही आणि इतरांनाही खाऊ देणार नाही.’ 

तिसऱ्या कोठडीतील दृश्य आणखी मजेशीर होते. तेथील तरुण कुत्र्याला मनोभावे अन्न भरवीत होता. राजा म्हणाला, ‘याला आपल्या मुदपाकखान्यात घ्या. हा उत्तम पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालेल.’ 

चौथ्या कोठडीतील प्रकार आणखी वेगळा होता. तेथील तरुण अक्षरशः कुत्र्याच्या मानगुटीवर बसून जेवण करीत होता. राजा म्हणाला, ‘याला आपल्या संरक्षण विभागाचा प्रमुख करा. हा त्यासाठी योग्य आहे.’ 

राजाची माणसांची पारख करण्याची रीत वेगळी होती. प्रत्येकातील ‘मी’चा कल जाणून घेण्यासाठी राजा 

उत्सुक होता. 

आपण आपल्यातील ‘मी’ जाणून घेण्यासाठी किती उत्सुक असतो? आपण कायम आपली इतरांशी तुलना करीत असतो. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा आणि बनण्याचा प्रयत्न करीत असतो. हा खरेतर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्यातील ‘मी’चा अपमानच असतो. व्यक्तिमत्त्व नावाच्या मूल्याशी केलेली ती प्रतारणाच असते. आपल्याकडे मुलांना नेहमी बजावले जाते, ‘अमक्यासारखा हो, तमक्यासारखा हो.’ पण तुझ्या रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणांनी बहरलेले तुझे व्यक्तिमत्त्व आम्हाला हवे आहे, असा आग्रह कोणी धरत नाही. 

प्रत्येक माणसातील ‘मी’ ही त्याच्या अस्तित्वाची खूण असते. अनेकदा त्याच्यासाठी ती प्रेरक शक्ती असते. मी हे केले, मी हे करू शकतो, मला हे करायचे आहे, असा आत्मविश्वास माणसामध्ये निर्माण करून त्याला एखाद्या कार्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मोठी ताकद ‘मी’मध्ये असते. सैनिकांच्या हातात कितीही धारदार आणि अत्याधुनिक शस्त्रे दिली; पण त्यांच्यातील ‘मी’ लढण्यासाठी तयार नसेल, तर त्या शस्त्रांचा काय उपयोग? इतर वेळी ‘मी’ हा अहंकाराचा निदर्शक म्हणून स्वीकारला जातो; पण त्या त्या कार्यक्षेत्रात ‘मी’ हा उर्जास्रोत म्हणून कामाला येऊ शकतो. 

जोपर्यंत ‘मी’ हा स्वत्वाची खूण म्हणून काम करीत असतो, तोपर्यंत त्या ‘मी’पणाला आणि पर्यायाने येणाऱ्या अहंकाराला माणसाचा दागिना किंवा सद्गुण म्हणून स्वीकारले पाहिजे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या अहंकराचे गर्वात रूपांतर होते आणि ते त्या माणसाच्या जडणघडणीला हानीकारक ठरू शकते. 

कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा जसा शेवटी विषात रूपांतरीत होतो; तसेच ‘मी’पणाचेही आहे. 

माणसांच्या व्यक्तिमत्त्वात गुण-दोषांचा संयोग असतो. दोषविरहित माणसे शोधूनही सापडणार नाहीत. सापडलीच, तर ती माणसे असणार नाहीत. काही माणसे विनयशील असतात; पण त्यांच्याबदल थोडासाही आदर वाटत नाही; कारण त्यांच्याकडे भूमिका नसते, ठामपणा नसतो. कोणीही यावे आणि वाकवावे, अशा पद्धतीने ती वाकत असतात. अशा माणसांकडे पाहिल्यानंतर वाटते, ‘परमेश्वराने यांना थोडा जरी ‘मी’पण किंवा अहंकार दिला असता, तर किती बरे झाले असते?’ थोडासा ‘मी’पणा, अहंकार व्यक्तिमत्त्वाची पत आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी निश्चित उपयोगी पडू शकतो; पण याची मात्रा वाढली, तर ती व्यक्तिमत्त्वाला अपायकारक ठरू शकते. जेव्हा माणसाच्या ‘मी’पणाला उर्मटपणाची आणि उद्धटपणाची झालर असते, तेव्हा माणसातील चांगल्या गुणांपेक्षा त्याच्यातील अहंकाराचीच चर्चा अधिक होताना दिसते. 

जगज्जेता अलेक्झांडर खूप महत्त्वाकांक्षी, पराक्रमी आणि अहंकारी होता. हा अहंकार पराक्रमातून, यशातून येणे स्वाभाविक होते; पण त्याला जीवनाचे अंतिम सत्य अखेरच्या क्षणी का होईना, उमगले होते. मृत्यूपूर्वी त्याने स्नेहांकितांना सांगितले, ‘मृत्यूनंतर ज्या खड्ड्यात तुम्ही मला पुरणार आहात, तेथे तुमच्या इच्छेखातर हव्या त्या मौल्यवान वस्तू तुम्ही टाका; पण माझे दोन्ही हात मात्र मोकळेच राहू द्यात. लोकांना कळू द्या, हा जगज्जेता सिकंदर जग जिंकूनही जाताना बरोबर काहीच घेऊन जाऊ शकला नाही.’ कर्तृत्वाची शिखरे गाठल्यानंतर असे अलगद ‘मी’पण गळून पडण्यात एक वेगळा अर्थ आहे. तो समजावून घेता आला, तर अहंकार दागिना म्हणून मिरवण्यात कोणालाही धन्यताच वाटेल. 


प्रत्येकाला "अहंकार" असतो, कोणाला कमी कोणाला जास्त पण अहंकार असतोच, पद, पैसा, प्रतिष्ठा, यातून अहंकार वाढतो, मी पणा वाढतो आणि माणुसकी निघून जाते. मीच मोठा दुसरा हलका ही वृत्ती निर्माण होते, यातून सुटायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवा.जसा आपला अहंकार महत्वाचा तसेच दुसऱ्या व्यक्तीला पण त्याचा अहंकार असू शकतो हा विचार खूप बदल घडवू शकतो. 
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।।

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◾कविता :- नवरा माझा

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ कृषी :- शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विविध लेख...

◼️प्रेरणा :- 🧐 जसा विचार कराल तसेच घडत जाईल | Law of attraction ...

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...

◾ललित लेख :- स्ञी

◼️कविता :- उद्याचे काय होणार कोणास माहीत... | marathi poem on life | Arjun Apparao Jadhav

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे | Marathi Ukhane For Bride